कबनूर-प्रतिनिधी
कबनूर (ता. हातकणंगले) येथील लक्ष्मी मंदिर ते रुई फाटा या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून सदर रस्ता तात्काळ दुरुस्त करावा अन्यथा क्रांती दिना दिवशी रस्त्यामधील खड्ड्यामध्ये वृक्षारोपण करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी नागरिकांनी निवेदनाद्वारे ग्रामपंचायतीकडे केली आहे.

येथील लक्ष्मी मंदिर,चिंतामणी कॉलनी या परिसरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.या रस्त्यावर इतके खड्डे पडले आहेत की रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते हा प्रश्न आहे.त्यामुळे या रस्त्यावरून जाताना तारेवरची कसरत करावी लागते.या ठिकाणी छोटे-मोठे अपघात नित्याचे बनले आहेत.मात्र याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

अनेकदा निवेदने
सदर रस्ता दुरुस्त करावा यासाठी अनेक वेळा प्रयत्न झालेले आहेत. नागरिकांनी याबाबत निवेदनेही दिली आहेत.मात्र या रस्त्याची डागडुजी अद्याप झालेली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी निवेदन देऊन,तात्काळ हा रस्ता करण्यात यावा अन्यथा मोर्चा काढण्यात येईल व या रस्त्यातील खड्ड्यामध्ये झाडे लावण्याचा इशारा दिला आहे.सदर निवेदन सरपंच शोभा पोवार व ग्रामविकास अधिकारी गणपत आदलिंग यांनी स्वीकारले.
निवेदनावर प्रशांत भिऊगडे, ऋषिकेश कोरवी,सुरज चव्हाण,पार्थ सुतार,पियुष सावंत,सुशांत माने,साहिल तोडकर,रोहित घोरपडे,आदित्य देवले, तानाजी भोसले,अनमोल जाधव,ओम तिबिले आदींच्या सह्या आहेत.
कोल्हापूर बायपास
सदर रस्ता थेट इचलकरंजी, आभारफाटा,लक्ष्मी मंदिर,रुईफाटा मार्गे कोल्हापूर रस्त्याला जोडतो.त्यामुळे वाहनांची संख्या अधिक आहे. तसेच रस्ताही अरुंद आहे.त्यामुळे लवकरात लवकर हा रस्ता करणे गरजेचे आहे.