कोल्हापूर(online24taas team)
शासन आपल्या दारी उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागांनी जबाबदारीपूर्वक काम करावे असे प्रतिपादन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.तसेच या कार्यक्रमासाठी योग्य ते नियोजन करावे अशा सूचना देण्यात आल्या.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांची प्रवास, आरोग्य व जेवण व्यवस्था चोखपणे ठेवावी.कार्यक्रमाच्या ठिकाणी बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.शासन आपल्या दारी उपक्रम दिनांक 11 जून 2023 रोजी सायंकाळी पाच वाजता तपोवन मैदानावर होणार असून प्रत्येक तालुक्यातून अडीच ते तीन हजार लाभार्थी कार्यक्रम ठिकाणी येण्याचे नियोजन केले आहे.
राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्याचा महासंकल्प केलेला आहे. त्याच अनुषंगाने दिनांक 11 जून 2023 रोजी कोल्हापूर शहरातील तपोवन मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केलेला असून जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुख यांनी त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी व दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात शासन आपल्या दारी कार्यक्रम पूर्वतयारी आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. केसरकर मार्गदर्शन करत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर,जिल्हाधिकारी राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, निवासी उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी शिल्पा पाटील, तहसीलदार स्वप्निल पवार व अन्य विभागाचे प्रमुख उपस्थित होते.
