कबनूर-प्रतिनिधी
कबनूर ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी 17 ऑगस्ट पासून सुरू केलेले काम बंद आंदोलन,उपसरपंच सुनील काडाप्पा यांच्या 3 ओळीच्या पत्राने स्थगित करण्यात आले.त्यामुळे उपसरपंचांचे गावात कौतुक होत आहे.मागील अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये दाखल झालेल्या केसेस मध्येही उपसरपंचानी असेच लक्ष घालून,त्या मिटवण्यात पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतीच्या एका सफाई कर्मचाऱ्याला,एका ग्रामपंचायत सदस्याने शिवीगाळ केल्याचा आरोप करून,श्रमिक जनरल कामगार संघटनेच्या वतीने,कॉम.आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली 17 ऑगस्ट पासून कामबंद आंदोलन सुरू केले होते.संबंधीत ग्रा.पं. सदस्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी संघटनेने रेटून धरली होती.याबाबत डीवायएसपीनाही निवेदन दिले होते.
सुमारे 12-13 दिवसापासून संप सुरू होता.मात्र ग्रामपंचायत प्रशासन व सदस्यांनी याला प्रतिसाद दिलाच न्हवता.त्यामुळे कर्मचारी संप कोण मिटवणार अशी परिस्थिती निर्माण झाली होती.सदर संप मिटवण्यासाठी सोमवारी हालचाली गतिमान झाल्या होत्या.मात्र सदर पत्रावर सह्या करण्यास काही सदस्यांनी नकार दिल्याने संप सुरूच होता.
आंदोलनात फूट
संप सुरू असतानाच सोमवारी 12 कर्मचारी कामावर हजर झाल्याने संघटनेच्या आंदोलनात फूट पडली होती.त्यामुळे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा कामगार नेत्यांनी दिला होता.
अखेर उपसरपंच सुनील काडाप्पा यांनी पुढाकार घेत,मंगळवारी केवळ 3 ओळीचे पत्र दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले.त्यामुळे हे पत्र देण्यास त्यांनी इतका वेळ का लावला?त्याचवेळी पत्र दिले असते तर कर्मचाऱ्यांचे नुकसान झाले नसते अशी चर्चा जाणकार मंडळीतून होत आहे.दरम्यान सरपंच शोभा पोवार यांनी कामगार प्रश्नाबाबत दुटप्पी भूमिका घेतल्याबद्दल कामगार संघटनेच्या बैठकीत निषेध व्यक्त करण्यात आला.